विक्रम बनकर (नगर) : येत्या २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश प्रभू श्री रामाच्या भक्ती रसात तल्लीन होणार आहे. नगर मध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन सर्वानी केले आहे. तेव्हा या दिवशी प्रभू श्री रामाविषयीच्या आमच्या अस्मितेला धक्का लावू नका, या दिवशी देशी विदेशी दारू दुकाने आणि कत्तल खाने बंद ठेवा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे.
याबाबत चे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. त्यात यांनी म्हंटले आहे की,
येत्या २२ जानेवारीला संपूर्ण भारतातील भाविक भक्त श्रीराम मय झालेले असतील. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले असेल. नगर शहरात सर्वच मंदिरात भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ते कार्यक्रम सकाळपासूनच सुरु होतील आणि रात्री उशिरापर्यंत चालतील. शहरातील बहुतांश मंदिरांच्या जवळपासच देशी विदेशी दारूची दुकाने असतील किंवा चिकन मटणाचे तसेच मासे विक्रीचे स्टोल असतील आणि तर जर सरसकट चालू असतील तर त्यामुळे राम भक्तांच्या आस्थेला तडा जाईल आणि त्यातून जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त होईल.
एखाद्या रामभक्ताने जर मंदिरा जवळचे तसले दुकान तात्काळ बंद करण्याचा आग्रह धरला आणि त्या दुकानदाराला विनंती किंवा दमदाटी केली आणि त्याने ती ऐकली नाही तर त्यातून वादावादी बाचाबाची असे प्रकार घडू शकतात.
एक तर राम मंदिर व्हावे यासाठी १९९२ ते २०२४ हा ३० -३२ वर्षांचा काल श्री राम भक्त प्रतीक्षा करीत होता. त्यातच जर या दिवशी दारू दुकाने अथवा खाटीक खाणे सर्रास पणे सुरु ठेऊन प्रशासनाने धर्म भ्रष्ट करण्याचे काम केले तर आमच्या अस्मितेला धक्का लागेलं आणि संघर्ष उभा राहिला तर कायदा सुव्यवस्था शांतता ठेवणे प्रशासनाला जड जाईल तेव्हा वर शासकीय पातळीवर मोदी फडणवीस काय निर्णय याबाबत घ्यायचा तो घेतील पण स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, स्थानिक आमदार खासदार यांनी आमच्या सामान्य रामभक्तांच्या विनंतीचा आदर करावा आणि ही दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढावा अन्यथा शिवसैनिक या दिवशी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन जबरदस्तीने ही दुकाने बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा त्यांनी दिला आहे.