सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर महापालिकेत सर्व राजकारणी कुरघोड्या करण्यात गुंतले असताना शहर विकासापासून दुरावत आहे. एखाद्या खेड्याप्रमाणे शहराची अवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
          शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. दररोज शहरात लहान मोठे अपघात घडत असून, कोरोनापेक्षा जास्त नागरी समस्येने नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांमुळे नागरिकांना पाठीचा त्रास सुरु झाला असून, रस्ते उखडल्याने सर्वच रस्ते धुळीने माखले आहेत. शहरात ड्रेनेजलाईनचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असताना, अनेक भागात नळाद्वारे मैलमिश्रीत दुषित पाणी येत आहे. यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्‍न देखील निर्माण झाले आहेत.
          शहरात रस्त्यांचा थांगपत्ता राहिलेला नाही. खड्डयांचे राजकारण तापले असताना त्याचे काम मात्र होताना दिसत नाही. निवडणुक संपल्यावर कोणताही नगरसेवक नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास तयार नाही. नगरसेवक कुठे आहे? हे कळणे देखील नागरिकांना अवघड झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे काय प्रश्‍न आहेत? याची त्यांना जाणीव नाही. सर्वच रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की, शहरातील रस्ते कुठे गेले? हा प्रश्‍न पडला आहे. शहरातील राजकारणी एकमेकांना खड्ड्यात पकडत असताना विकासाच्या मुद्दयावर त्यांनी भाष्य करावे. सर्व राजकारणी व लोकप्रतिनिधींनी विकासाच्या दृष्टीने काम करण्याची सर्वसामान्य नगरकरांची अपेक्षा आहे. शहरात भाजप व शिवसेना भांडत असले तरी एकाची केंद्रात तर दुसर्‍याची राज्यात सत्ता असल्याचे विसरुन चालणार नाही. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी आणून मुलभूत प्रश्‍न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे विनोद गायकवाड यांनी सांगितले आहे.

आणखी बातम्या

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.